विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सामना करणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार असून सध्या भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत.
२४ जूनपासून टीम इंडियाच्या खेळाडूंची सुट्टी सुरू झाली असून १४ जुलैला ते कुटुंबीयांसह पुन्हा बायो-बबलमध्ये दाखल होतील. या सुट्टीत भारतीय खेळाडू विम्बल्डन, यूरो फुटबॉल किंवा अन्य ठिकाणी फिरण्यास जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या खेळाडूंमधील युवा गोलंदाजाला बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्यासोबत सुट्टीवर जायला आवडणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या राखीव खेळाडूंमध्ये गुजरातच्या वलसाड येथील अर्जान नगवस्वाला याला संधी देण्यात आली आहे. जर त्याला इंग्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवले, तर ४६ वर्षानंतर प्रथमच पारसी खेळाडू टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. फारुख इंजिनीयर यांनी १९७५साली भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
अर्जानला महान फलंदाज सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायची आहे. तेच त्यानं सेलिब्रिटी क्रशबद्दल सांगितले की, त्याला दिशा पाटनीवर क्रश आहे. त्याला इंग्लंडमध्ये सुट्टीसाठी जायचंय. १७ ऑक्टोबर १९९७मध्ये अर्जानचा गुजरात येथे जन्म झाला. २३ वर्षीय डावखुरा जलदगती गोलंदाजाच्या कामगिरीनं निवड समिती सदस्यांना प्रभावित केले आहे.
२०१७-१८च्या सत्रात त्यानं बडोदा संघाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्यानं हळुहळू सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं तिसऱ्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यात सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे यांचा समावेश होता. तो सामना गुजरातनं ९ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानं ८ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्यो होत्या आणि ९० धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
रणजी करंडक स्पर्धेच्या त्याच्या दुसऱ्या पर्वात त्यानं ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या. जानेवारी २०२०मध्ये त्यानं पंजाबविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. गुजरातनं तो सामना ११० विकेट्सनं जिंकला होता. विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं ७ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या आणि ५४ धावांत ६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. दुसरीकडे त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ५ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या.